तरूणाईत आकर्षण, गावकऱ्यांनाही भुरळ
SINDEWAHI | 02 MAY 2024
लग्नाच्या सर्व रूढी-परंपरांना फाटा देत तालुक्यातील गुंजेवाही येथे सत्यशोधक पद्धतीने एक अनोखा लग्नसोहळा काल (दि. ०१) पार पडला.
विशेष म्हणजे वधू-वर चि. सौ. कां. कोमल व चि. राहूल दोघेही माळी समाजाचे असून त्यांच्या कुटुंबीयांनी व या जोडप्यानेही सत्यशोधक विवाहाचा (satyasodhak marriage) मार्ग निवडल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
‘लग्न’ ही प्रत्येकाच्याच जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण त्याचबरोबर अनेक चुकीच्या प्रथा, कालबाह्य ठरलेल्या रूढी आणि त्यातून होणारे शोषण यांना जणू खतपाणी घालण्याचे कामच या विवाह संस्कृतीने बळकट केल्याचे दिसते.
कर्ज काढून केलेला वायफळ खर्च, दिखाऊपणा, कुठल्याही पद्धतीचा बडेजाव न करता महात्मा जोतिराव फुले यांना आदर्श मानत सत्यशोधक पद्धतीने लग्न लावण्याचा निर्णय गुंजेवाही येथील मुलीचे वडील असणारे अतीसामान्य कुटुंबातील काशिनाथ चौधरी व भेजगांव येथिल गणपत मोहुर्ले यांच्याकडून घेण्यात आला आणि त्याला वधू-वरानेही होकारही दिला.
असा झाला लग्नसोहळा
महात्मा जोतिराव फुले, सावित्रीबाई फुले, जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फोटो लग्न मंडपाच्या ठिकाणी लावण्यात आले होते. या वेळी लग्न मंडपात वधु-वराचे आगमन होताच महापुरुषांच्या प्रतिमेचे पुजन व दिप प्रज्वलन करून उपस्थितांना वधु-वराचा व त्यांच्या कुटुंबीयांचा परीचय करुन देण्यात आला. यासोबतच विधीकर्ते सुनिल कावळे यांनी सत्यशोधक विवाह संस्कारासंदर्भात माहीती ही केले.
प्रत्यक्ष विवाहावेळी वधूवराच्या हातात हार देवून
महात्मा फुले रचित मंगलाष्टके गाऊन उपस्थितांच्या साक्षीने लग्नविधी पार पडले. तद्नंतर वधू-वरास शपथ देऊन नंतर लग्न लावण्यात आले. या वेळी पारंपरिक मंगलाष्टकांऐवजी महात्मा फुलेंनी रचलेली मंगलाष्टके म्हटली गेली. वधू-वरांच्या डोक्यावर अक्षतांऐवजी फुलांचा वर्षाव करण्यात आला. विवाह सोहळ्यात लगेचच मॅरेज सर्टिफिकेट आणि सुनिल कावळे लिखित क्रांतीकारक मायबाप हे पुस्तक ही सत्यशोधक समाज संघातर्फे नवदांपत्याला देण्यात आले.
या सत्यशोधक विवाह संस्कारास सत्यशोधक विधीकर्ते सुनिल कावळे, माळी समाजाचे अध्यक्ष सुभाष शेंडे, कोषाध्यक्ष हरिचंद्र गुरनुले, ग्रा पं. सदस्य चंद्रकांत मोहुर्ले, सामाजिक कार्यकर्ते गुरू शेंडे, किरन बोरुले, भगवान दुर्गे आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.