पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा!
KOLKATA | 27 MARCH 2024.
गेल्या काही वर्षांमध्ये अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या धाडी वाढल्या आहेत. यावरुन विरोधक सतत केंद्र सरकारवर सडकून टिका करतात. अशातच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (दि. २७) एक मोठे वक्तव्य केले.
पश्चिम बंगालमधील गरिबांकडून लुटलेला आणि अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केलेला पैसा लोकांना परत करणार, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) केले आहे.
कृष्णनगर लोकसभा मतदारसंघात तृणमूल काँग्रेसच्या महुआ मोईत्रा यांच्या विरोधात भाजपने राजघराण्यातील सदस्य अमृता रॉय यांना उमेदवारी दिली आहे. आज पंतप्रधान मोदींनी अमृता यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, ईडीने पश्चिम बंगालमध्ये ३००० कोटी रुपये जप्त केले आहेत. हा सर्व गरिबांचा पैसा आहे. कोणी शिक्षक होण्यासाठी पैसे दिले, तर कोणी कारकून होण्यासाठी पैसे दिले. माझी इच्छा आहे की, नवीन सरकार बनताच गरीब जनतेचा पैसा त्यांना परत केला जावा. यासाठी मी कायदेशीर सल्ला घेतोय. बंगालच्या लोकांनी विश्वास ठेवावा की, ईडीने जप्त केलेले ३००० कोटी रुपये परत करण्यासाठी भाजप (BJP) सरकार काही ना काही मार्ग शोधेल. असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.